केडगाव प्रतिनिधी :- अशोक अडसूळ
एकीकडे वनविभागाच्या जागेवर झालेली मोठी अतिक्रमणे नजरेआड करायची आणि दुसरीकडे स्वताची मालकी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खाजगी जागेतील शेतीचे काम बंद पाडण्यासाठी दबाव निर्माण करायचा, असा प्रकार समोर आला आहे. पुरोगामी संघर्ष परिषदेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पवार यांच्या मालकीची जमीन गट नंबर २३३/२ ‘अ’ या जागेत सुरू असलेल्या लेव्हलिंगच्या कामावर वनविभागाने आक्षेप घेत काम बंद करण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.
सुरेश पवार यांच्या मालकीची ही जागा असून, त्यावर लेव्हलिंगचे काम सुरू होते. मात्र, वनविभागाचे वनरक्षक मदने हे सदर ठिकाणी आले व चालू असलेले लेव्हलींगचे काम बंद केले.त्यांना पवार यांनी काम बंद करण्याचे कारण विचारले असता त्यांनी मला माहीत नाही मला वनपाल विर मॅडम यांनी पाठवले असून काम बंद करायला सांगीतले आहे.त्यावर पवार यांनी वनपाल विर मॅडम यांना फोन लावण्यास सांगीतले तेव्हा वनरक्षक मदने यांनी विर यांना फोन लावला असता विर मॅडम यांनी काम बंद करण्याचे कारण न सांगता पवार यांच्याशी बोलण्यास नकार दिला. काम बंद न केल्यास मी तिथे फौजफाटा घेऊन येऊ का ? आम्ही काही अफगानिस्तान वरून आलो नाही.तेव्हा पवार यांनी तुम्ही स्वतः कागदपत्र घेऊन या व ही जमीन कोणाची आहे किंवा आमची तरी जमीन कोठे आहे ते दाखवा असे म्हटल्यावर तुमच्यात हिम्मत असेल तर शासकीय यंत्रनेच्या नादी लागा असे धमकावल्याने हा सरळ सरळ आमच्यावर अन्याय असल्याची भावना पवार कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. सदर संभाषणाचे संपूर्ण रेकॉर्डींग आमच्या प्रतिनिधींना प्राप्त झाले आहे.
पवार कुटुंबियांनी या प्रकरणावर बोलताना वनविभागाच्या दुटप्पी धोरणाचा पर्दाफाश केला आहे. त्यांनी आरोप केला आहे की, यापूर्वी त्यांनी स्वतः वनविभागाच्या हद्दिच्या खुना काही व्यक्तींनी उपटून फेकल्या आहेत तरी आपण येऊन त्या पुन्हा पुर्ववत कराव्यात असे लेखी निवेदन दिले होते.तसेच वनविभागाच्या जागेवर अनेकदा मोठी अतिक्रमणे झाली आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही वनविभागाने कधीच कोणतीही तत्परता दाखवली नाही. उलट तक्रारदारांना उडवाउडवीची उत्तरे देऊन अजुन आमची हद्द फिक्स नाही,आमच्या जागेचा लवकरच सर्वे होणार आहे,सदरची जागा महसूल विभागाच्या ताब्यात आहे अशी दिशाभूल करणारी तोंडी व लेखी उत्तरे देण्यात आल्याचे पवार यांनी सांगीतले.मात्र आता खाजगी जागेतील कामे बंद करण्यासाठी वनविभागाचा हा उत्साह अनाकलनीय आहे
.एकंदरीत १) सदर शेतीकाम बंद करण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी का आले ? २) सदर जागा खाजगी असताना वनविभागाने अडकाठी का आणली ?३) शेतकऱ्यास त्याने काम बंद का करावे याचे स्पष्टीकरण का दिले नाही ? ४) सदर कामाबद्दल कोणाची तक्रार होती का ? ५) वनविभागाने काही आर्थिक देवाणघेवाण करून काम बंद करण्याचा प्रयत्न केला आहे का ? ६) कोणाच्या सांगण्याने हा सर्व प्रकार होत आहे का ? असे एक ना अनेक प्रश्न आम्हाला पडल्याचे पवार यांनी सांगीतले.
आमच्या प्रतिनिधींनी दूरध्वनीवरून वनसंरक्षक राहूल काळे यांच्याशी संपर्क साधून सदर प्रकरणाबाबत विचारणा केली असता माझ्याकडे कोणतीही तोंडी अथवा लेखी तक्रार आली नसून सदर बाबत मला कसलीच कल्पना नसल्याचे त्यांनी सांगीतले.वनपाल विर यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
वनविभागाकडून सुरू असलेला हा मनमानी कारभार आणि दबाव तंत्राचा आम्ही निषेध करतो, असे सांगत पवार कुटुंबियांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन वस्तुस्थिती तपासावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
वनविभागाने सदर जमीन नेमकी कोणाची वनविभागाची का खासगी मालकीची याची शहानिशा करून जर वनविभागाच्या जागेत अतिक्रमण झाले असेल तर झालेली सर्वच अतिक्रमणे निःपक्षपाती पणे काढून शासकीय जागा ताब्यात घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.






