बोरीपार्धी :- अशोक अडसूळ
बोरमलनाथ मंदिर परिसरातील वनविभागाच्या जागेत अतिक्रमण करून व खोटी कागदपत्र सादर करून उभारलेल्या बेकायदेशीर दवाखान्यावर कारवाई कधी होणार ? तक्रार करून दोन महीने उलटून गेले पण अजुनही कारवाई नाही. लवकरात लवकर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा बोरमलनाथ देवस्थान बचाव समितीचा इशारा.
बोरमलनाथ देवस्थान बचाव समितीची तालुका आरोग्य अधिका-यांकडे तक्रार.
बोरमलनाथ देवस्थानचे पुजारी कैलास शेलार यांचे चिरंजीव निलेश शेलार यांनी बोरमलनाथ मंदिर परिसरात वनविभागाची जमिन सर्वै नंबर १२४ मध्ये अतिक्रमण करून बांधलेल्या इमारतीत नाथसखा आयुर्वेदिक दवाखाना सुरू केला आहे.दवाखाना सुरू करताना त्यांनी जिल्हा आरोग्य विभागात बोरमलनाथ देवस्थान इनाम जमिन गट नंबर १४४ व ग्रामपंचायत मिळकत नंबर १४५६/3 ची कागदपत्र सादर केलेली आहेत. परंतू दवाखाना मात्र भलतीकडेच चालवून शासनाची दिशाभूल करून फसवणूक करत असल्याचे बोरमलनाथ देवस्थान बचाव समितीच्या निदर्शनास आल्याने समितीने तालुका आरोग्य अधिकारी दौंड यांच्याकडे दिनांक – ४.६.२०२६ रोजी तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. तालुका आरोग्य अधिकारी यांनी सदर चौकशी कामी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र केडगाव यांची नेमणूक करून अहवाल सादर करण्यास सांगीतले.आरोग्य अधिकारी डाॅ. लोखंडे मॅडम यांनी तक्रारदार यांना लेखी उत्तर देऊन कळविले की,सदर जागेची हद्द ठरविणेची बाब या कार्यालयाशी निगडित नाही.सदर बाब वनविभागाशी निगडित असल्याने आपण वनविभाग यांच्याशी संपर्क साधून खात्री करावी असे कळविल्याने बचाव समितीच्या सदस्यांनी प्रतिप्रश्न केला की, जर जागेची खात्री करण्याची जबाबदारी तुमची नसेल तर मग परवानगी देताना सातबारा उतारे का घेता ? आरोग्य अधिकारी दौंड यांना तुम्ही कारवाई करण्याऐवजी टाळाटाळ करत आहात आम्ही त्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयात तक्रार करणार आहोत असा इशारा बचाव समितीने दिला होता.
बोरमलनाथ देवस्थान बचाव समितीची जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार.
बोरमलनाथ बचाव समितीने जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे दिनांक – १८.६.२०२६ रोजी तक्रार करून सदर बाबत योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती केली.जिल्हा आरोग्य अधिकारी पुणे यांनी त्रिसदस्यीय समीतिची स्थापना करून समितीत जिल्हा आरोग्य विभागाचे डाॅ.चिद्रवार,तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.उज्वला जाधव व डाॅ.आसिफ शेख यांची नेमणूक केली. त्याअनुषंगाने डाॅ.चिद्रवार यांनी नाथसखा आयुर्वेदिक दवाखान्याला भेट देऊन कागदपत्रांची मागणी केली होती परंतू डाॅ.निलेश शेलार यांनी दि.३१.६.२०२६ रोजी मला लेखी उत्तर देण्यासाठी सात दिवसांची मुदत द्यावी अशी विनंती केली त्याप्रमाणे त्यांना मुदत देण्यात आली होती.त्यांनी दि.९.७.२०२६ रोजी आपले लेखी म्हणने मांडले की, १) माझा सुरू असलेला दवाखाना हा भाडेपट्टीवर आहे.२) तो गट नंबर १४४ व ग्रामपंचायत मिळकत नंबर १४५६/३ मध्येच आहे.३) सदर जमिन ही सर्वे नंबर १२४ मधे असून त्याची हद्द कायम नाही व शेतकरी आणी वनविभाग यांच्यात सर्वोच्च न्यायालयात वाद चालू आहे.४) सदर मिळकतीची ग्रामपंचायत दप्तरी नोंद असुन ग्रामपंचायतने तसा ना हरकत दाखला दिला आहे.सदर दवाखाना चालकांनी दोन्ही वेळा हेच म्हणने मांडले आहे परंतू सदर बाबत एकही ठोस पुरावा अथवा कागद सादर केला नाही.उलट बचाव समीतीने दवाखाना गट नंबर १४४ मधे नसल्याचा मंडल अधिकारी यांचा पंचनामा,ग्रामपंचायत मिळकत १४५६/3 मध्पे इमारतीची नोंद नसल्याचा आठ अ उतारा. व वनविभागाच्या जागेत दवाखान्याचे अतिक्रमण केल्याने कैलास शेलार यांच्यावर वन गुन्ह्य दाखल झाल्याचे कागदपत्र सादर केले आहेत.दवाखाना चालक यांनी दिलेले लेखी उत्तर है चुकीचे असून ते अजूनही खोटी माहिती सादर करून शासनाची दिशाभूल करत आहेत. ते फक्त “आजचे मरण उद्यावर ढकलने” या म्हणी प्रमाणे वेळ काढू पणा करत असल्याचा आरोप बचाव समितीने केला आहे.
लवकरात लवकर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.
सदर बाबत बचाव समितीच्या सदस्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी हंकारे साहेब यांची भेट घेऊन कारवाई बाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी सदर दवाखाना चालक यांना दवाखाना गट नंबर १४४ मध्येच असल्याचे शासकीय पंचनामा करून कागदपत्रांचे पुरावे सादर करण्याचे शेवटचे नोटीस काढले आहे तसेच तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.उज्वला जाधव यांचा अहवाल अजुन आला नाही तो येताच मी पुढील कार्यवाही करतो असे सांगीतले.आता बचाव समितीला प्रश्न पडला आहे की,दोन महीन्यात अहवाल का येऊ शकला नाही ? बचाव समितीच्या सदस्यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अहवालाबाबत विचारणा केले असता मी दोनच दिवसात अहवाल सादर करते असे त्यांनी सांगितले आहे.आरोग्य विभागास ठोस पुरावे सादर करून देखील आरोग्य विभाग कारवाई करत नसल्याचा आरोप बचाव समितीच्या सदस्यांनी केला आहे.लवकरात लवकर सदर दवाखान्यावर कारवाई करून खोटी कागदपत्र सादर करणारांवर शासनाची दिशाभूल करून फसवणूक केल्याबद्दल गुन्हे दाखल करावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा बचाव समितीच्या वतीने देण्यात आला आहे.





